नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने पूर्वपदावर आल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील करोनाचा प्रभाव संपुष्टात आल्याचे मानले जाते. तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या काळात भारताचा विकास दर उणे पातळीवरून इतिहास जमा होऊन अधिक 0.4 टक्के इतका नोंदला आहे.
पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून 2020 या काळात विकास दर कोसळून उणे 24.4 टक्के इतका नोंदला गेला होता. या काळात भारतात लॉक डाऊन सुरू होते. नंतर अर्थव्यवस्थेने दमदार वाटचाल केली तरीही दुसऱ्या तिमाहीत विकास दर उणे 7.3 टक्के इतका नोंदला गेला होता. तिसऱ्या तिमाहीतही विकास दर उणे पातळीवर राहील की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र कंपन्यांनी जोमाने काम करून तिसऱ्या तिमाहीत विकास दर थोडा का होईना पण सकारात्मक पातळीवर नेला आहे.
त्यामुळे चौथ्या तिमाहीतील विकास दर 8 टक्क्यांच्या दरम्यान जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. पुढच्या वर्षाचा विकास दर विविध विश्लेषक संस्थांनुसार अधिक 10 ते 13.5 टक्क्यावर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारत लवकरच जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होणार आहे. सध्या चीन जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात चीनची अर्थव्यवस्था साडेसहा टक्के दराने वाढली आहे.
अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर आल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले असले तरी पुन्हा भारतात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आगामी काळात निर्बंध लावले गेल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.