चंदीगड : टी-20 क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर त्यातही पहिलीच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा भारतीय संघाला अखेरच्या षटकात जिंकूऩ देणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा आता करोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी जनजागृतीही करत आहे. 2007 साली महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना जोगिंदर संघात होता. या स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केली होती. पाकिस्तानचा मिसबाह उल हक हा अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर होता तर, धोनीने अननुभवी जोगिंदरच्या हाती चेंडू सोपविला व त्याला अखेरचे षटक टाकण्यासाठी तयार केले.
जोगिंदरच्या या षटकांत मिसबाहने चौकार फटकावले मात्र, अखेरच्या चेंडूवर पूल मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला व भारताने हा सामना जिंकत विश्वकरंडक क्रिकेट इतिहासात पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभूत न होण्याचा इतिहास कायम राखला. त्या एका षटकाने जोगिंदरचे आयुष्यच बदलून गेले. तो एका रात्रीत देशाचा हिरो झाला. हाच जोगिंदर शर्मा आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरियाणा पोलीस दलात कार्यरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर खरेतर संपूर्ण देशातील पोलिसांचे काम वाढले आहे. त्यात जोगिंदरदेखील 12-14 तास ड्युटीवर असून नागरिकांना घराबाहेर पडू नका, करोनापासून वाचायचे असेल तर सरकारने केलेल्या सूचना पाळा असे आवाहन करत आहे.
कर्णधार विराट कोहलीसह आज देशभरातील क्रिकेटपटू जनतेला काळजी घेण्याचे तसेच घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, जोगिंदर प्रत्यक्ष फिल्डवर राहून करोनाचा धोका असतानाही आपली सेवा बजावत आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जोगिंदर हरियाणा पोलीस दलात डीएसएपी पदावर काम करत आहे. जोगिंदरनेच याबाबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जोगिंदरने भारताकडून 4 एकदिवसीय व 4 टी-20 सामने खेळले आहेत.