भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरत आहे. मात्र, जितके रान विराट कोहलीच्या अपयशावर उठवले गेले ते पाहता रोहित बीसीसीआयचा जावई आहे का, असा प्रश्न पडतो. त्याने संघाचे नेतृत्व हाती घेतले तेव्हापासून ना त्याच्या नेतृत्वात चमक दिसली ना त्याच्या वैयक्तिक कामगिरीत. मग केवळ 10 ते 12 चेंडू खेळण्यासाठीच त्याची उपलब्धी आहे का?
कोहलीला मोठी खेळी करण्यात अपयश येत होते तेव्हा त्याने निवृत्त व्हावे किंवा किमान टी-20 क्रिकेट तरी खेळू नये, असे सल्ले दिले गेले होते. आता रोहितला काय सल्ला देणार? मुख्य म्हणजे विक्रमादित्य सुनील गावसकर यावर बोलणार का? आपली मुंबई म्हणणारे गावसकर रोहितबाबत चकार शब्दही काढत नाहीत याचे आश्चर्य वाटते. ते रोहितच नव्हे तर मुंबईकर खेळाडू सोडून कोहलीसह सगळ्या खेळाडूंना सल्ला द्यायला तत्पर असतात मग आता मूग गिळून गप्प का बसले आहेत?
रवी शास्त्री हे प्रशिक्षक असताना ते मुंबईकर असूनही त्यांनी कायम कोहलीला पाठिंबा दिला. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनन्ट हे वाक्य त्यांनी कायम सुनावले व आशिया करंडकात कोहलीने शतक साकार केले. मात्र, रोहित सध्या एखाद्या क्लब दर्जाच्या फलंदाजासारखा चाचपडताना दिसत आहे. त्याच्या तरी बॅटमधून कुठे मोठी खेळी घडली आहे. 10, 12, 20, 25 अशा धावसंख्येवर तो बाद होतो. नेतृत्वातही काहीही चमक दिसत नाही.
केवळ मुंबई इंडियन्सला सर्वात जास्त विजेतेपद मिळवून दिल्यामुळे त्याच्याकडे महान कर्णधार म्हणून पाहिले जाते याचेही हसू येते. कर्णधाराने स्वतःच्या कामगिरीचा आदर्श अन्य खेळाडूंसमोर ठेवत सरस कामगिरीसाठी त्यांनाही प्रोत्साहित केले पाहिजे. रोहित मात्र, एक झेल हातून सुटलेल्या अर्शदीप सिंगशी संवादही साधायला उत्सुक नव्हता हेच आपण आशिया करंडक स्पर्धेत पाहिले.
रोहितची देहबोली पाहिली की असे वाटते तो स्वतःच्या कामगिरीबाबत किंवा एक कर्णधार म्हणून संपूर्ण जबाबदारी घेण्याबाबत गंभीरच नाही. पुढील महिन्यात आपल्याला टी-20 विश्वकरंडक खेळायचा आहे हेच त्याच्या देहबोलीतून दिसत नाही. इतक्या मोठ्या स्पर्धेपूर्वी होत असलेल्या या मालिकांबाबत त्याला गांभीर्यच नाही हेच सिद्ध होत आहे. त्याचा हाच ऍटिट्युड भारतीय संघाला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महागात पडणार आहे.