– अमित डोंगरे
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चौथ्या कसोटीतही मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. अर्धशतकाच्या जवळ आल्यावर ज्या पद्धतीने तो बाद झाला ते पाहून या गुणी खेळाडूचा प्रवास किंग कोहली ते मांडलिक या वाटेवर व्हावा याचे शल्य वाटते. कधीकाळी सचिनचे सगळे विक्रम मोडणार असे ज्याच्याबाबत सांगितले जात होते तोच आता धावांसाठी झगडताना दिसत आहे.
गेल्या तब्बल दीड वर्षांपासून त्याच्याकडून शतकी खेळी झालेली नाही. अर्धशतकी खेळ्या त्याने अनेक केल्या मात्र, त्या तर महंमद शमी, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, ऋषभ पंत किंवा अजिंक्य रहाणेही करतो मग त्यासाठी कोहली कशाला हवा. कोहलीने संपूर्ण संघाची जबाबदारी पेलणे महत्त्वाचे आहे.
सचिन तेंडुलकरने हे संपूर्ण कारकिर्दीत केले ते कोहलीला सलग दोन वर्षे जमलेले नाही. त्याचे उदात्तीकरण खूप झाले आता ऑस्ट्रेलियन मानसिकता राबवायला हवी. परफॉर्म ऑर पेरीश याच नीतीवर संघ निवड केली जावी. मागे एकदा मोहिंदर अमरनाथ यांना सुमार कामगिरीमुळे संघातून वगळले गेले होते. तेव्हा त्यांच्या पूर्वपुण्याईवर बरेच समीक्षक बरगळले होते.
मात्र, तरीही निवड समिती ठाम राहिली होती. खेळाडू कोण आहे ते पाहण्यापेक्षा त्याची कामगिरी कशी आहे ते कधी पाहिले जाणार. चेतेश्वर पुजाराही खेळपट्टीवर तासन्तास थांबतो पण म्हणजे तो राहुल द्रविडचा वारसदार झाला का. द्रविड धावाही करायचा तेच नेमके पुजारा करत नाही मग त्याला तरी संघात स्थान का द्यावे.
तिसऱ्या चौथ्या कसोटीत त्याने धावा केल्या पण बैल गेला अन धोपा केला अशा धा काय कामाच्या. कोहलीने याच मालिकेत 23 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. हे सगळे होत असताना व प्रत्येक सामन्यात त्याने मैदानावर पाऊल ठेवले की विक्रम होत आहे पण फक्त कामगिरी होताना दिसत नाही.
सचिनवर केवळ संघाचा भार नव्हता तर संपूर्ण देशाचा भार होता कोहलीने निदान संघाचा भार तरी वाहायला काय हरकत आहे. एकेकाळी त्याच्या धावा झाल्या नाहीत तरी संघात अन्य असे फलंदाज होते की जे ती पोकळी भरून काढत होते. आज रोहित वगळता अन्य एकही खेळाडू नाही की जो ती जागा भरून काढेल.
ज्या खेळपट्ट्यांवर व ज्या गोलंदाजांवर कोहली एखाद्या जगजेत्त्याप्रमाणे हुकुमत राखत होता तोच कंग कोहली आज धावांसाठी मांडलिक झाल्याचे दिसते व त्रास त्याचाच होतो. एखादा मुलगा ढ असेल तर त्याच्याकडून अपेक्षाही केली जात नाही पण मेरिटमध्ये येणारा मुलगा अचानक काठावर पास व्हायला लागला की काळजी वाटते.