मुंबई – दुखापतीतून पूर्ण सावरलेला लोकेश राहुल भारतीय संघात पुनरागमन करत असून त्याच्याकडेच संघाचे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. आता त्याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ पुढील आठवड्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या तिन एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे.
बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने राहुलची तंदुरुस्ती चाचणी घेतली होती, त्यात तो पूर्ण तंदुरुस्त ठरल्यानंतरच त्याचा संघात समावेश करण्यात आला. तसेच नियमित कर्णधार रोहित शर्माने विश्रांती घेतल्यामुळे राहुलकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शिखर धवनला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
राहुल जर अनफिट ठरला असता तर धवन झिम्बाब्वे दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करणार होता. या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती व त्यात रोहितसह विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे.
रोहितसह सगळ्यांचीच चाचणी होणार
आशिया करंडक स्पर्धेसाठी निवडलेला संघ बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सराव करत आहे. यादरम्यान नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह सर्व खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी येत्या 18 ऑगस्ट रोजी होणार असून त्यानंतरच संघ 20 ऑगस्टला अमिरातीला रवाना होईल. त्यानंतर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंची करोना तसेच आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.