सिडनी – भारतीय संघाविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळताना, कायमच आमचा ऑस्ट्रेलियाचा संघ बलवान मानला गेला आहे. हा संघ समतोल आणि भक्कम असून गेल्या वेळच्या ऑस्ट्रेलियन कसोटी संघाशी सध्याच्या संघाची तुलना केल्यास एक गोष्ट नक्की सांगता येईल की आताचा संघ अधिकच भक्कम आहे, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी म्हटले आहे.
जॉन बुकानन यांच्या वक्तव्यानंतर भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने भारतीय संघच बलाढ्य असल्याचे म्हटले आहे. त्याने भारतीय गोलंदाजी चांगलीच मजबूत असल्याचे सांगितले. वर्ष 2018 च्या मालिकेत ज्याप्रमाणे टीम इंडियाची गोलंदाजी होती तशीच आताही आहे, असे पूजाराने म्हटले आहे.
जरी ऑस्ट्रेलिया संघात स्मिथ, वॉर्नर आणि मार्नस लेबुशेनसारखे उत्तम खेळाडू व दणकट फलंदाज असले तरी त्यांना सहज विजय मिळणार नाही. आमचे गोलंदाज त्यांना झटपट तंबूत पाठविण्याची क्षमता राखून आहेत, असे पुजारा म्हणाला.
दरम्यान, पुजाराने वर्ष 2018 च्या हंगामात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 74.42 च्या सरासरीने 521 धावा ठोकल्या होत्या आणि आक्रमक ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दमछाक झाली होती.