मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बॅंकेने, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता, शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात घट केली आहे.
बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या अगोदर शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून घेतलेल्या कर्जावर साडेसात टक्के व्याजदर होता, तो आता केवळ सात टक्के करण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या काळामध्ये शेतकऱ्यांना तातडीच्या भांडवलाची गरज आहे. ही बाब ध्यानात घेऊन बॅंकेनेही कर्ज ही योजना तयार केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना या कर्जावरील व्याजदरात सवलत देण्यात आलेली आहेत.
जुलै महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले तर त्यावर प्रत्येक महिन्याला 583 रुपयांचे व्याज लागणार आहे. तारण ठेवलेल्या सोन्याच्या एकूण मूल्याच्या 85 टक्के कर्ज दिले जाते. या कर्जाची परतफेड सहा महिन्यात करणे अपेक्षित आहे.