श्रीनगर – लडाख सेक्टरमध्ये चीनने कोणतीही आगळीक केल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे असे लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, या भागातील सीमेचे रक्षण आणि देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष गस्त आणि तांत्रिक माध्यमांद्वारे योग्य ती उपाययोजना करीत आहोत. प्रत्यक्ष ताबा रेषवर वरील स्थिती एकतर्फी बदलण्याच्या चीनच्या कृती विषयी राजनैतिक तसेच प्रत्यक्ष कृती स्तरावर एकाच वेळी प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले.
चीनकडून कोणत्याही आक्रमक प्रयत्नांना निश्चितपणे सैन्याच्या योग्य प्रतिसादासह प्रत्युत्तर दिले जाईल आणि त्यासाठी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय राखून मजबूत उपाययोजना केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक अर्थसंकल्पात गरिबांचे हित केंद्रस्थानी – पंतप्रधान मोदी
लेफ्टनंट जनरल द्विवेदी म्हणाले की, सतत विकसित होणाऱ्या धोक्यांना आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी नॉर्दर्न कमांडची तयारी आणि मनोबल उच्च स्थितीत आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखमधे अनेक सुरक्षा आव्हाने उभी केली जात आहेत. परंतु कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आमची सेना वचनबद्ध आहे. आम्ही सतत जागरुक आहोत, सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत आहोत आणि आमच्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलू,असेही द्विवेदी यांनी नमूद केले. ते म्हणाले की, आमच्यापुढे जी जी आव्हाने निर्माण होत आहेत त्यातून आमचा दृढ संकल्प अधिकच मजबूत झाला आहे.