कोलंबो – भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात कर्णधार शिखर धवनसह आघाडीच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 20 षटकांत 8 बाद 81 धावांवर संपुष्टात आला.
नाणेफेक जिंकत कर्णधार शिखर धवनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताची सुरुवात निराशाजनक ठरली. कर्णधार शिखर धवन भोपळाही न फोडता माघारी परतला. चामिराच्या गोलंदाजीवर धनंजय डिसिल्वाने त्याचा झेल घेतला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे तीन गडी झटपट बाद झाले.
देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन आणि नितीश राणा यांना दुहेरी धावसंख्याही उभारता आली नाही. धनंजय डिसिल्वाने ऋतुराज गायकवाडला 14 धावांवर बाद करत त्याचाही अडसर दूर केला. भारताची 9 षटकांतच 5 बाद 36 अशी बिकट अवस्था झाली.
यानंतर भुवनेश्वर कुमारने 16 धावा आणि कुलदीप यादवने 23 धावा केल्याने भारताला 81 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.