नवी दिल्ली – भारत आणि जपान यांच्यात दूरसंचार क्षेत्रातील 5 जी तंत्रज्ञानाच्या करारासह आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अन्य तांत्रिक विषयावरील करार करण्यात आले आहेत.
भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर आणि जपानचे विदेश मंत्री तोशिमित्सु मोतेगी यांच्यात आज टोकिओ येथे झालेल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले आहेत.
इंडो-पॅसिफिक भागात जपानने कनेक्टिव्हीटी क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. जयशंकर यांनी या बैठकीनंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमच्या या चर्चेत आम्ही त्रयस्थ देशांच्या विकास प्रकल्पांवरही चर्चा केली.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि प्रसार लक्षात घेऊन दोन्ही देशांनी आता एकमेकांना अधिक सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारत आता चीनच्या हुएई या कंपनीऐवजी 5 जी तंत्रज्ञानासाठी जपानची मदत घेणार आहे. त्यावर आजच्या करारामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.