नवी दिल्ली – करोनाच्या विरोधातील जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू होत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या लसीच्या संशोधनाबद्दल त्यांनी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांनांचे कौतुकही केले आहे. त्यांनी या लसीच्या संशोधनासाठी जे योगदान दिले आहे त्याचा भारताला अभिमान आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
भारताच्या औषध नियंत्रकांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या वापरला अनुमती दिली आहे. त्यामुळे हे लसीकरण देशात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय हवमान परिषदेत बोलताना मोदींनी ही मेड ईन इंडिया लस विकसित करणाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना त्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी संख्यात्मक उत्पादनाबरोबरच गुणात्मक उत्पादनाचीही मोठी गरज असल्याचे नमूद केले. कोणत्याही प्रगतीशील समाजासाठी संशोधन ही एक महत्वाची बाब आहे. त्याचा समाजासाठी आणि व्यापारासाठीही महत्वाचा उपयोग असतो असे त्यांनी नमूद केले.
ज्या देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर दिले त्या देशांना त्यांच्या मजबूतीसाठी लाभ झाला असे इतिहासात दिसून आले आहे. ते म्हणाले की आम्ही संपुर्ण जगात केवळ भारतीय वस्तु भरू इच्छित नाही. पण भारतीय वस्तुंविषयी जगभरातील लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली पाहिजे असे ते म्हणाले. सार्वजनिक आणि सरकारी या दोन्ही क्षेत्रातून उत्तम सेवा आणि दर्जेदार उत्पादन व्हावे, त्यातूनच देशाची जगातील शक्ती वाढणार आहे असेही त्यांनी नमूद केले.