जम्मू – भारताची शेजारी राष्ट्रे असलेल्या पाकिस्तान आणि चीनने साम्राज्यवादी बनण्याच्या नादात भारताचा बराचसा भूभाग बळकावलेला आहे. अशा प्रकारे बळाच्या जोरावर पाकिस्तान आणि चीनने बळकावलेली इंच अन् इंच भारतीय भूमी परत घेतली जाईल, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी सोमवारी व्यक्त केला.
पाकिस्तान आणि चीनने हजारो चौरस किमी क्षेत्र असलेल्या भारतीय भूभागावर अवैधरित्या कब्जा केला आहे. तेथील नागरिक भारतीयच आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवासी सध्या पाकिस्तानविरोधात घोषणा देत असून बलुचिस्तानमध्येही पाकविरोधीच वातावरण आहे. ते लोक लवकरच त्यांच्या मूळ मायभूमीचा म्हणजेच भारताचा भाग बनतील, असे चित्र निर्माण होत आहे. भारतीय भूमी परत मिळवण्यासाठी प्रसंगी लष्करी सामर्थ्य दाखवले जाईल, असे रैना यांनी “तिरंगा रॅली’त सांगितले.
जम्मू-काश्मीरला जोपर्यंत पुन्हा एकदा 370 कलमासह विशेष राज्याचा दर्जा परत मिळत नाही; तोपर्यंत तिरंगा हाती घेणार नाही, असे वक्तव्य नुकतेच पीडीपीच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले. त्यावरून रैना यांनी मेहबुबा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भारतात राहायचे असेल तर तिरंग्याचा सन्मान करावाच लागेल. तिरंग्याचा अवमान करणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवले जाईल, असे रैना यांनी सांगितले.