कराड – देशाची शिक्षण व्यवस्था सक्षम व तरुणांना परिपूर्ण करण्यासाठी 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण स्पष्ट केले. वास्तव स्थितीत भरकटलेल्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी बदलत्या शैक्षणिक धोरण कौशल्य विकास ज्ञानावर आधारलेली शिक्षण व्यवस्था जून 2023 पासून अंमलात येणार आहे. या कौशल्य विकास ज्ञानावर आधारलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी परिपूर्ण व सक्षम होईल. कौशल्य ज्ञानाने विकसित असणारे तरुण संपूर्ण जगाला केवळ भारतच देवू शकेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
येथील शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री व उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल, टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी राम नाईक होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हा. चेअरमन अनघा परांडकर, चंद्रशेखर देशपांडे, राजेंद्र लाटकर, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक गोकुळ अहिरे, ऍड. सदानंद चिंगळे, डॉ. मिलिंद पेंढारकर, तसेच आजी-माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी संस्था शताब्दी निमित्त तयार करण्यात आलेले स्मरणिकेचे प्रकाशन, संस्थेच्या नवीन एनटीए या राष्ट्रीय परीक्षा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. संस्थेच्यावतीने भगवद्गीता लेखनाचा विश्वविक्रम केल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतल्याचे प्रमाणपत्र खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अनिल हुद्देदार यांनी संस्थेस 3 लाखाचा धनादेश संस्थेचे विश्वस्थ आ. बाळासाहेब पाटील यांचाकडे सुपूर्त केला.
राम नाईक म्हणाले, टिळकांची प्रेरणादायी चरित्र सतत नव्या पिढी समोर रहावे, या उदेशाने 11 देशभक्तांनी कराडमध्ये शिक्षण मंडळ या संस्थेची व टिळक हायस्कूलची स्थापना केली. त्याला आज 102 वर्ष पूर्ण झाली; याचा सार्थ अभिमान वाटतो. व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी हसत राहा, चांगल्याचे कौतुक करा, दुसऱ्याचा अपमान करू नका, जे काम कराल; ते अधिक चांगले होण्यासाठी सतत प्रयत्न करा. या चार गुरुमंत्राचा स्वीकार प्रत्येकाने केल्यास जीवनात शत्रुत्व वाट्याला न येता मित्रत्वच येते.
खा. पाटील म्हणाले, टिळकांच्या स्मृति जपणारी शिक्षण संस्था व टिळक हायस्कूल ही शिक्षण क्षेत्रातील ज्ञान दानाची पवित्र मंदिरे आहेत. आबादी ते शताब्दी असा शिक्षणाचा कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणारी ही दोन प्रेरानास्थळे आहेत. शिक्षणाबरोबरच देशप्रेमाची धडे देणारी ही शाळा बदलत्या युगात कौतुकास पात्र आहे. कृष्णाकाठावरती शिक्षण मंडळाचा ज्ञान यज्ञ सुरु असून या ज्ञान मंदिराची पालखी पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, शिक्षण मंडळाचा व टिळक हायस्कूलचा देशभर नावलौकिक असून तो माजी विद्यार्थ्यांनी वाढविला आहे. या शाळेने अनेक महान व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी घडवले आहेत. काळानुसार संस्थेने आधुनिक बदल केलेत. याही पुढे संस्था नवनवीन विद्याशाखांची निर्मिती करत आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी परिपूर्ण होण्यासाठी संस्था व शाळा परिपूर्ण राहील. नवनवीन संकल्पना राबवून ही शिक्षण संस्था पुढे घेवून जाण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्नशील राहू. बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक चंद्रशेखर देशपांडे, सूत्रसंचालन अभिजित कुलकर्णी व सौ. बाबर, तर मुख्याध्यापक जी. जी. अहिरे यांनी आभार मानले.
संस्थेने निधीसाठीचा प्रस्ताव तयार करावा
शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूल महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील नावाजलेली केंद्रे आहेत. शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी संस्थेच्या व शाळेच्या अडचणी जाणून घ्या, त्या निश्चितच सोडवू, असा निरोप दिल्याचे ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगून ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आम्ही भरघोस मदत करू. त्यांचे बॅंक खाते सुरु करा. आम्ही या कमी सीएसआर फंडातून भरघोस मदत करू, तसेच आज केवळ काही रक्कम न देता मी संस्थेला प्रस्ताव तयार करायला सांगतो, निधी दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.