दुबई – भारताने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये, ही मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, भारतीय संघाने जर पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द केला तर बीसीसीआयला या सामन्याचा संपूर्ण नफा पाकिस्तानला द्यावा लागेल, तसेच आयसीसीकडून कारवाईही होऊ शकते. त्यामुळे द्विपक्षीय मालिका बीसीसीआय रद्द करू शकते पण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळण्यास नकार देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती असली तरीही याबाबतचे कवित्व अद्याप कायम आहे.
भारताने जर पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळण्याचे ठरवले किंवा माघार घेतली तर पाकिस्तानला पुढे चाल मिळेल. त्यामुळे पाकिस्तानला हा सामना न खेळताच दोन गुण मिळतील. भारतीय संघाला एकही गुण मिळणार नाही. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेचा विचार केला आणि भारताला जर बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांच्यासाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरेल.
आयसीसीच्या स्पर्धेतील कोणत्याही देशाने आपला सामना रद्द करण्याचे ठरवले तर त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असते. सर्वात जास्त प्रेक्षकवर्ग आणि पैसा कमावून देणारा हा सर्वात मोठा सामना आहे. त्यामुळे आयसीसी हा सामना भारताला रद्द करू देणार नाही. कारण आयसीसीच्या स्पर्धेत कोणताही देश प्रतिस्पर्धी संघाविरुद्धचा सामना रद्द करू शकत नाही. पण जर असे झाले तर या सामन्यातून मिळणारा सर्व नफा बीसीसीआयला पाकिस्तान क्रिकेट मंडळ व आयसीसीला द्यावा लागेल. त्यामुळे बीसीसीआयचे आर्थिक नुकसान होईल.
हा सामना न खेळण्याचा निर्णय भारताने यापूर्वी घेतला असता तर आयसीसीकडून 1996 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेप्रमाणे परिस्थितीनुसार विचार केला जाऊ शकत होता. त्यावर्षी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. सामना काही दिवसांवर आलेला असताना भारताने जर हा सामना खेळण्यास नकार दिला तर याचा विपरीत परिणाम जागतिक क्रिकेटवर होऊ शकतो.