नवी दिल्ली: जागतिक तापमान वाढीचा भारताला पुढील 80 वर्ष भीषण परिणाम भोगावा लागणार आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून पुढे आला आहे. या काळात प्रचंड उष्णतेची लाट येणे, महापूर येणे असे धोके भारताला भेडसावणार आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताच्या वार्षिक किमान तापमानात येत्या काही काळात 4.2 अंश सेल्सियस इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे.
सौदी अरेबियांतील किंग अब्दुल अझिज विद्यापीठाने हे संशोधन केले असून त्याचे नेतृत्व प्रा. मन्सूर अलमजरूई यांनी केले आहे. भारत हा जगातला लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला देश आहे. वातावरणातील बदलाला या देशाने प्रभावी तोंड देण्याच्या बाबतीत उपाययोजना करण्याची संवेदना दाखवलेली नाही. त्यामुळे 21 व्या शतकातील उर्वरित 80 वर्षात भारताला या भीषण समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
भारताची सारी इको सिस्टीमच धोकादायक बनली असून तिला अत्यंत आव्हानात्मक स्थितीला भविष्यात तोंड द्यावे लागणार आहे. वातावरण बदलाच्या स्थितीचे सुपर कॉम्प्युटरच्या सहाय्याने विश्लेषण करून त्यांनी हा निष्कर्ष मांडला आहे. या काळात उत्तरपूर्व भारतातील तापमानात किमान 6 अंश सेल्सीयस इतकी वाढ होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हिमालयीन भागातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळेल आणि त्यातून उष्णतेचा प्रकोप आणखी वाढण्याची शक्यता आहे.