नवी दिल्ली – रशियाकडून भारताला करारानुसार शस्त्रपुरवठा सुरळीत सुरू आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार रशियाकडून भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनचा पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनशी संबंधित महत्त्वाच्या यंत्रणेचा पुरवठा होईल. यानंतर भारत S-400ची दुसरी स्क्वाड्रन देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्याचे काम सुरू करेल.
भारताने पहिली S-400ची स्क्वाड्रन भारत-पाकिस्तान सीमेवर पंजाबमध्ये सज्ज ठेवली आहे. रशियाकडून मिळालेल्या S-400मुळे पाकिस्तानला भारतावर हवाई हल्ला करणे कठीण झाले आहे. भारताची हवाई सुरक्षा आणखी सक्षम झाली आहे.
भारताने रशियासोबत पाच S-400 स्क्वाड्रन खरेदी करण्यासाठी पाच अब्ज डॉलरचा करार केला आहे. या करारांतर्गत S-400ची पहिली स्क्वाड्रन डिसेंबरमध्ये भारतात दाखल झाली. दुसरी स्क्वाड्रन भारतात टप्प्याटप्प्याने येत आहे.
रशियाने तयार केलेली S-400 ही जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या मदतीने 40 ते 400 किमी. पर्यंतच्या टप्प्यात हवाई हल्ला करणे तसेच शत्रूचे हवाई हल्ले आकाशातच नष्ट करणे शक्य आहे. प्रचंड वेग, आधुनिक रडार यामुळे S-400 अतिशय प्रभावी हवाई संरक्षण यंत्रणा झाली आहे.
भारताला S-400मुळे पाकिस्तानच्या विमानांच्या आणि क्षेपणास्त्रांच्या हालचाली उड्डाण होताच लक्षात येतात. यानंतर रडारद्वारे संबंधित विमानाचा वा क्षेपणास्त्राचा पाठलाग करणे आणि धोका जाणवल्यास ते नष्ट करण्याची क्षमता भारतातील S-400मध्ये आहे.