-जयेश राणे
अभियांत्रिकी शिक्षण तंत्रज्ञान विकासाचा पाया आहे. मात्र “एनआटी’कडे विद्यार्थ्यांनी चक्क पाठ फिरविल्याचे सध्याचे चित्र पाहता भारताचा तंत्रज्ञान विकास कसा होईल? याची कारणे शोधणे आणि त्याबाबत कृती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी शिक्षणात प्रॅक्टिकल ज्ञानाला महत्त्व देऊन स्मार्ट वर्क होऊ लागले की भारत तंत्रज्ञानात अग्रेसर होण्याचे दिवस दूर नाहीत.
अभियांत्रिकी पाठोपाठ “राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थे’तही (एनआयटी) जागा रिक्त राहिल्या. उदाहरण म्हणून लक्षात घेता येईल की, वर्ष 2019 च्या अधिकृत आकडेवारीनुसार देशातील 31 “एनआयटी’मधील 3 हजार 334 जागा रिक्त राहिल्या आहेत. दरवर्षी जागा रिक्त राहत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांचे घसरत असलेले मानांकन आणि प्लेसमेंटच्या अभावामुळे विद्यार्थी या शिक्षण संस्थांकडे पाठ फिरवत आहेत, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने एकंदरित अभियांत्रिकी शिक्षणावरही प्रकाश टाकणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था असली तरी येथील अभ्यासक्रम अभियांत्रिकी शिक्षणापेक्षा थोडा अद्यावत, कठीण असतो. असे असले तरी हे सर्व म्हणजे अभियांत्रिकीचीच सरमिसळ होय. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि अभियांत्रिकी यामध्ये मिळत असलेले शिक्षण म्हणजे दोन विरुद्ध दिशा असे नाही. थोडक्यात, त्याला अभियांत्रिकीतील उच्चतम शिक्षण संस्था असे म्हणता येईल. प्लेसमेंट देणारी बहुराष्ट्रीय आस्थापने महाविद्यालयांच्या मानांकनास महत्त्व देतात. ज्याला आस्थापनांच्या दृष्टीने महत्त्व आहे, तेच घसरलेले असेल तर त्याठिकाणी नामांकित आस्थापने कशी येणार? ते घसरण्यामागे अन्यही काही कारणे असतात. त्याला किती गांभीर्याने घेतले जाते? याविषयीही पाहूया.
अभियांत्रिकी प्रवेशाकडे असलेला ओढा आता अल्प झाला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण न घेताही विद्यार्थ्यांना उत्तम वेतनाच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये प्रायोगिक भागाला पुष्कळ महत्त्व असले पाहिजे. मात्र या शाखेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या “प्रक्टिकल फाइल्स’ पूर्ण करणे, जे तास होतात त्यांच्या “असाइनमेंट’ पूर्ण करणे यातच त्यांचा पुष्कळ वेळ जातो. विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी केवळ सोपस्कार म्हणून घाईगडबडीत पूर्ण केल्या जातात. त्याचा त्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ज्ञान म्हणून किती उपयोग होतो, हा खरा संशोधनाचा विषय आहे. काही वर्षांनी अभ्यासक्रम बदलतो. पण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना “कारकून’ बनवणाऱ्या अभ्यासाच्या पद्धतीत मात्र कायापालट झालेला नाही? असे का? याचे उत्तरही विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. वर्षानुवर्षे हेच रडगाणे आहे. परिणामी अभियांत्रिकी शिक्षणाची पदवी असूनही त्या विद्यार्थ्याकडे बाजारासाठी आवश्यक असणारी कुशलता नाही, अशी अवस्था आहे. ज्यांच्या बुद्धिमत्तेचा स्तर अधिक आहे तेच यातून निभावतात. अन्य मात्र गाळ म्हणून तळालाच राहतात.
खरेतर त्यांच्यातही बाजाराच्या आवश्यकतेप्रमाणे कुशल बनणायची क्षमता असते. पण त्यांच्या श्रमाचा अधिक वेळ फाइल्स पूर्ण करणे, लेखी परीक्षेची तयारी करणे यातच जातो. आता या सर्व घडामोडींत प्रॅक्टिकल ज्ञान आहे तरी कुठे, हा नेहमीचाच प्रश्न आहे. सर्वांना घेऊन वाटचाल करायची आहे, तर सर्वप्रथम सर्वसमावेशक आणि प्रॅक्टिकल ज्ञानाला अधिकांश महत्त्व देणारा अभ्यासक्रम तयार करणे निकडीचे आहे. अन्यथा जे वर्षानुवर्षे सुरू आहे, तेच यापुढेही सुरू राहाणार यात तिळमात्रही शंका नाही.
अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असताना प्लेसमेंट होणे हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र अभियांत्रिकी शाखेतून शिक्षण घेतले आहे म्हणजे त्याला निश्चित नोकरी मिळणार, हे 10-15 वर्षांपूर्वीचे दिवस आता राहिलेले नाहीत. वर्तमान युग हे स्पर्धेचे आहे, असे अनेकदा ऐकले असेल. ते सत्यच आहे. कला, वाणिज्य शाखेत शिकत असलेला विद्यार्थी बाजाराच्या आवश्यकतेप्रमाणे संगणकीय प्रणाली शिकून त्यामध्ये पारंगत होत असेल, तर तोही संगणकीय अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसह त्याच स्पर्धेत सहभागी असतो.
एकंदरित स्पर्धा वाढते. म्हणजेच काय तर अत्यंत अटीतटीची, चुरशीची स्पर्धा होते. अभियांत्रिकी व्यतिरिक्तच्या अन्य शाखांतील विद्यार्थी बहुसंख्येने संगणकीय प्रणाली, नेटवर्किंग आदी माहिती तंत्रज्ञानातील सूत्र शिकत आहेत आणि त्यामध्ये ते वेगाने पुढेही जात आहेत. त्यासाठी ते तशा गोष्टी शिकवणाऱ्या बाजारातील शिकवण्या लावत आहेत. तिथून आवश्यक ते मार्गदर्शन प्राप्त करून घेत करिअरची नवीन वाट निवडत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे वर्तमान स्थिती विस्तीर्ण आहेच, पण आगामी काळातही त्यात अधिक वाढ होणार आहे. येथे सतत नवीन सूत्र विकसित केली जातात. त्याचा विविध गोष्टी “हायटेक’ करण्यासाठी उपयोग होत असतो. एवढा सर्व पसारा सांभाळण्यासाठी त्याच तोडीच्या कुशल मनुष्यबळाची येथे सतत आवश्यकता असते. कारण त्यांच्या बळावरच विविध तंत्रज्ञान, प्रणाली बाजारात आणणे शक्य असते.
तंत्रज्ञानात यशस्वी झालेल्या जगभरातील काही प्रसिद्ध मंडळींनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले नाही. मात्र त्यांच्या स्वतःच्या आस्थापनांत अनेक अभियंते नोकरी करत आहेत. स्मार्ट वर्क म्हणजे प्रॅक्टिकल वर्क होय. केवळ फाइल्स पूर्ण करत बसणे, लेखी परीक्षा पास कशी होता येईल यासाठी अभ्यास करून बाजारात टिकणे असा विद्यार्थांचा कयास असेल तर स्पर्धेत टिकणे अशक्य आहे.