चेन्नई/कोची, – श्रीलंकेतील तमिळींचा प्रश्न सोडवण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही, तामिळनाडूतील मागास आणि शेतकऱ्यांचा केलेला गौरव याचबरोबर केरळच्या विकासाठी पर्यटन मॉडेल उभे करण्याचे दिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन यामुळे भारतीय जनता पक्षाने आपली “दक्षिणायन’ मोहिमेची पूर्वतयारी केल्याचे मानले जात आहे.
अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. श्रीलंकेत असणाऱ्या तमिळ बांधवांच्या हितासाठी मी कटीबध्द आहे, श्रीलंकेत तमिळबहुल असणाऱ्या जाफनाला भेट देणारा मी एकमेव भारतीय पंतप्रधान आहे. तेथे विकासकामे करून आम्ही श्रीलंकेतील तमिळींची काळजी घेतली आहे. श्रीलंकेत आम्ही 50 हजार घरे विस्थापित तमिळींसाठी बांधली आहेत असे मोदी म्हणाले. त्याच बरोबर तामिळ शेतकरी आणि मागस बांधवांचा त्यांनी गौरव केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळातील एका धावत्या दौऱ्यात त्या राज्यातील उद्योग व पर्यटनाशी संबंधीत काहीं प्रकल्पांचे उद्घाटन झाले. विलींग्टन आयलंड मधील रोरो सेवेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले तर कोचीन पोर्ट ट्रस्टच्या इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनलचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कोची येथे उभारल्या जाणाऱ्या सहा हजार कोटी रूपये खर्चाच्या पेट्रोकेमिल संकुलाची पायाभरणीही त्यांच्या हस्ते सुरू झाली. या साऱ्या प्रकल्पांमुळे केरळचा तर विकास होईलच पण देशाच्या विकासालाही त्यातून चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोरो सेवेमुळे नॅशनल वॉटरवेज मधून वाहने आणि प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणत नेआण केली जाणार असल्याने त्यातूनही नागरीकांची मोठी सोय होईल असे ते म्हणाले.
अर्जून लष्कराकडे सुपुर्त
स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेला अर्जून रणगाडा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराकडे सुपुर्त केला. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चेन्नाई येथे झालेल्या एका कार्यक्रमात या रणगाड्याचा स्वीकार केला. चेन्नाईतील लढाऊ वाहने संशोधन संस्था आणि डीआरडीओने संयुक्तपणे हा रणगाडा विकसित केला आहे. भारत सरकारने 8400 कोटी रूपये खर्चुन हे रणगाडे उत्पादित करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. चेन्नाईत सुरू केल्या जाणाऱ्या 9 किमी लांबीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ही त्यांच्या हस्ते सुरू झाले. तामिळनाडुत लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. तामिळनाडुतील अन्य दोन रेल्वे मार्गाच्या कामाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.