उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांची अपेक्षा
“सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’चा पदवीप्रदान समारंभ
पुणे – भारताला तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांसारखा मोठा वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी भारतात येत होते. आपल्याला पुन्हा एकदा भारताला “विश्वगुरू’चा दर्जा द्यायचा आहे. “टाइम वर्ल्ड युनिव्हर्सिटी’च्या क्रमवारीतील “टॉप 300′ विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही याची खंत वाटते. याबाबत प्रत्येक विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेने विचार करणे आवश्यक आहे, असे मत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
“सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’चा 16 वा पदवी प्रदान समारंभ नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला. सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, कुलसचिव एम.जी.शेजूल आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि शास्त्रज्ञ डॉ. टेस्सी थॉमस यांना मानद “डी.लिट’ पदवी प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट परदेशी विद्यार्थी म्हणून टांझानियाच्या अँजेलिना फ्रान्सिस विलियम्स यांना प्रा. एस. बी. मुजुमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती यांच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
शिक्षण मानवाला समृद्ध करते. लोकशाही आणि मानवाधिकारात शिक्षणाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. देशाला समृद्ध करण्यासाठी शिक्षण हे भविष्य आहे, असे अख्तर म्हणाले. तर डॉ. गुप्ते यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. डॉ. अनिता पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. येरवडेकर यांनी आभार मानले.
सिम्बायोसिसने पदवी प्रदान करुन जो सन्मान केला आहे, त्याबाबत आभारी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) मला काम करण्याची संधी दिल्यामुळे हा सन्मान मिळाला आहे. देशाला आज उत्कृष्ट संरक्षणाची आवश्यकता असून, त्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करणार.
-डॉ. टेस्सी थॉमस, शास्त्रज्ञ.