IND vs SA – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता औपचारिकता म्हणून राहिलेला मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी इंदोर येथे होणार आहे. मात्र त्याअगोदर एक मोठी बातमी समोर आली आहे. शेवटच्या सामन्यासाठी विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
एका वृत्तानुसार, विराट कोहली आणि केएल राहुल यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या टी-२० सामन्यातुन विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्या जागी इतर खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. केएल राहुल सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये असून त्याने आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात नाबाद अर्धशतक, तर दुसऱ्या सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावले आहे.
विराट कोहली पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने २८ चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी केली आहे. टी२० विश्वचषकापूर्वी भारताचा हा शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १६ धावांनी पराभव झाला. आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची नजर आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्यावर असणार आहे. दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. भारतीय संघाने २० षटकात ३ गडी गमावून २३७ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून मिलरने १०६ धावांची तुफानी नाबाद शतकीय खेळी खेळली.