दुबई – आशिया करंडक स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला काहीच वेळात सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या आव्हानासाठी सज्ज आहे. तसेच या सामन्यात सर्वांच्या नजरा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे असणार आहे.
भारतीय संघात विराट कोहली आणि के. एल. राहुल संघात पुनरागमन करणार आहेत. तसेच कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या अनुभवाच्या जोरावर पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाविरुद्ध चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तथापि, सूर्यकुमार, पंत आणि हार्दिक पंड्या हे त्रिकुट 10 ते 20 षटकांदरम्यान कशी कामगिरी करतात यावर बरेच काही अवलंबून असेल. हे त्रिकुट आपल्या स्फोटक सामर्थ्याने पाकिस्तानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करू शकतात.
दुसरीकडे बाबर आझम हा अनेक वर्षांपासून पाकिस्तान संघाचे यशस्वीपणे नेतृत्व करत आहे. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून बाबरने कामगिरीत सातत्य राखले आहे. मोहम्मद रिझवान सोबत त्याने संघाला निर्णायक सलामी दिली आहे. परंतु, या दोघांचा स्ट्राइक-रेट 130 पेक्षा कमी आहे.
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फखर जमान हा भारतीय गोलंदाजीसमोर अडचण ठरू शकतो. तर बाकीच्या फलंदाजांना सातत्य राखता आलेले नाही. असिफ अली, खुशदिल शाह, हैदर अली हे चांगले खेळाडू आहेत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमित धावा करण्यात ते फारसे अपयशी ठरले आहेत.
दरम्यान, आफ्रिदीची अनुपस्थिती हा पाकिस्तान, तर जसप्रीत बुमराह नसणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. तसेच भारताचा भरवशाचा गोलंदाज हर्षल पटेलच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार आणि युवा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट अर्शदीप सिंगवर गोलंदाजीची धुरा असणार आहे.