मुंबई – हिटमॅन रोहित शर्मा याला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडेच देण्यात आले आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीने या मालिकेतून वर्कलोडच्या कारणाने पहिल्या कसोटी सामन्यातून तसेच त्यापूर्वी होत असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेतली असून त्याच्या जागी रोहितकडेच कर्णधारपद दिले जाणार अशी शक्यता होती. मात्र, निवड समितीने रोहित नव्हे तर रहाणेच नेतृत्व करेल असे स्पष्ट केले आहे.
कानपूरला 25 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत पहिला कसोटी सामना होणार असून दुसरा कसोटी सामना 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत मुंबईत होणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणने संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे.
त्याने आतापर्यंत पाच कसोटीत नेतृत्व केले असून चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. या वर्षी रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता.
टी-20 मालिकेचे सामने 17 नोव्हेंबरला जयपूरला पहिला, 19 नोव्हेंबरला रांचीला दुसरा तर, 21 नोव्हेंबरला कोलकाताला तिसरा टी-20 सामना होणार आहे.