दुबई : इंडियन प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांतच पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पुन्हा एकदा दारुण पराभव पत्करावा लागला.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 110 धावा पर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तर न्यूझीलंडने 14.3 षटकांत 2 बाद 111 धावा करून विजयाची नोंद केली.
विजयासाठी १११ धावांचं तुटपुंजे आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर मार्टीन गप्टिल 20 धावा करून बाद झाला. मात्र केन विल्यमसन आणि डेरील मिचेल यांनी 62 धावांची भागीदारी रचत संघाचा विजय भक्कम केला. मिचेल 49 धावा करून बाद झाला. त्यानंतर विल्यमसन आणि डेवोन कॉन्वे यांनी न्यूझीलंडचा विजय निश्चित केला. विल्यमसनने नाबाद 33 आणि कॉन्वेने नाबाद 2 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. तर इतर गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.
स्पर्धेत पाकिस्तानकडून मानहानिकारक पराभव झाल्यानंतर आज नाणेफेक गमावून भारतीय संघ फलंदाजीला आलेला. मात्र सलामीत बदल करूनही भारताला फारशी चमक दाखवता आली नाही. सलामी जोडी केवळ इशान किशन (4) आणि लोकेश राहुल (18) संघाच्या 32 धावांवर तंबूत परतले.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने 14 धावा केल्या. त्यालाही मोठी खेळी करण्यात अपय़श आलं. तर कर्णधार विराट कोहली 9 धावा करून बाद झाला. भारताचा निम्मा संघ 70 धावांत तंबूत परतला होता.
दरम्यान तळाच्या फलंदाजांना देखील अपयश आलं. रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद 26 धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने २३ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला 110 धावा करता आल्या.