अहमदाबाद – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथी व अखेरची कसोटी आजपासून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होत आहे. या कसोटीतील विजयाद्वारे ही मालिका 3-1 अशी जिंकत आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा प्रवेश करण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. तर ही कसोटी जिंकत चार सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्याचे ऑस्ट्रेलियासमोर लक्ष्य राहणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वेळ ः सकाळी 9ः30 पासून
ठिकाण ः नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टस
खेळाडूंच्या दुखापती, कौटुंबिक कारणांनी मायदेशी परतणे या सगळ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ तसा कमकुवत बनला आहे. मात्र, तरीही त्यांनी तिसरी कसोटी जिंकत मालिकेत थाटात पुनरागमन केले होते हे विसरून चालणार नाही. पहिले तीनही कसोटी सामने अडीच दिवसांतच संपले त्यामुळे या मालिकेसाठी फिरकी गोलंदाजीला पुरकच खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत त्यामुळेच पहिल्याच दिवसापासून फिरकी गोलंदाजांना मदत मिळत आहे. या मालिकेत फलंदाजांनी अद्याप वर्चस्व राखलेले दिसून आलेले नाही. आता अहमदाबादची खेळपट्टी तरी फलंदाजीसाठी पोषक असेल अशी अपेक्षा आहे.
भारतीय संघाला सर्वात मोठी चिंता आहे ती प्रमुख फलंदाजांच्या अपयशाची. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक श्रीकर भरत या सगळ्यांनी सातत्य राखलेले नसल्याने भारतीय संघाला या सामन्यात तरी यांच्याकडून मोठ्या खेळीची गरज आहे. गोलंदाजांनी कामगिरी तर चांगलीच केली आहे. त्यातही अक्सर पटेल, रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीसह फलंदाजीतही धावा केल्यामुळेच पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. त्यामुळे याच त्रिकुटावर संघाची याही कसोटीत मदार राहणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाबाबत बोलायचे झाले तर नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतल्यामुळे स्टीव्ह स्मिथकडे संघाचे नेतृत्व आले आहे. त्याच्यासह मार्नस लेबुशेन, उस्मान ख्वाजा हे प्रमुख फलंदाजही अपयशी ठरत आहेत. नाथन लॉयन व नवोदित टॉड मर्फी यांच्या फिरकीमुळेच त्यांनी तिसरी कसोटी जिंकली होती. या कसोटीतही भारताच्या प्रमुख फलंदाजांवर अंकुश राखण्याची जबाबदारी त्यांच्यावरच राहणार आहे.
इशान किशनला संधी मिळणार
या कसोटीत सलामीवीर शुभमन गिल किंवा यष्टीरक्षक श्रीकर भरत यांच्यापैकी एकाला वगळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला या कोसटीसाठी या दोघांपैकी एकाच्या जागी संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघाला एक फलंदाज मिळेल तसेच यष्टीरक्षकही मिळेल. तसेच वेगवान गोलंदाज महंमद सिराज व उमेश यादवला वगळून अनुभवी महंमद शमीचा समेवश होण्याचीही शक्यता आहे.
फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी मात्र, पावसाचाही अंदाज
पहिले तीन सामने फिरकी गोलंदाजांसाठी लाभदायक ठरत असलेल्या खेळपट्टीवर खेळले गेले. या खेळपट्ट्यांवर टीकाही झाली. आता अहमदाबादच्या खेळपट्टीवर फलंदाजीसाठी नंदनवन असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सध्या अवकाळी पावसाने सातत्याने हजेरी लावली असल्याने या सामन्यावरही पावसाचे सावट राहणार आहे. सामन्याच्या दोन दिवस आधीही येथे मुसळधार पाऊस पडला होता.
दोन्ही देशांचे पंतप्रधान उपस्थित राहणार
या कसोटी सामन्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान थॉमस अल्बानिस उपस्थित राहणार आहेत. अल्बानिस सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत व त्यांनी या सामन्यासाठी उपस्थित राहण्याची इच्छाही प्रदर्शित केली होती. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.