साउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे, असे म्हटले जात होते. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानसमोर 225 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Excellent bowling effort from Afghanistan! 👏
They restrict the dangerous Indian lineup to 224/8 – can they chase it down to claim their first #CWC19 victory?#INDvAFG#AfghanAtalan#TeamIndia pic.twitter.com/4YWlj8gIiV
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 22, 2019
भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, मात्र त्याचा हा निर्णय अफगाण गोलंदाजानी चुकीचा ठरवला. भारतीय संघाला 50 षटकांत 8 बाद 224 धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा केवळ 1 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि के. एल. राहुल याने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण काही वेळातच के.एल. राहुलसुध्दा 30 धावांवर माघारी परतला. त्यावेळी भारताची 14.2 षटकांत 2 बाद 64 अशी अवस्था झाली होती.
त्यानंतर विजय शंकर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागिदारी करत भारताची धावसंख्या शंभरी पार नेली, मात्र त्यानंतर विजय शंकर 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळातच विराट कोहली सुध्दा 67 धावांवर बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 30.0 षटकांत 4 बाद 135 अशी होती.
विराट कोहली बाद होताच केदार जाधव आणि धोनीने भारताचा डाव सावरला. धोनी 28 धावांवर बाद झाला तर हार्दिक पाडंयाकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती, मात्र तोही अपयशी ठरला. आफताब अलाम याने हार्दिक पांड्या याला 7 धावांवर बाद केले. मात्र केदार जाधवने संयमी खेळी करत 68 चेंडूत 52 धावा करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
अफगाणिस्तान संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद नाबी आणि गुल्बदिन नाएबने प्रत्येकी 2 गडी बाद केले. याशिवाय राशिद खान,रहमत शाह, आफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.