भारतीय उपउच्चायुक्तांना पाचारण
इस्लामाबाद: सातत्याने शस्त्रसंधी भंग करून भारतीय हद्दीत मारा करणाऱ्या पाकिस्तानने त्या मुद्द्यावरून उलट्या बोंबा मारण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. आता 2017 पासून भारताने तब्बल 1 हजार 970 वेळा शस्त्रसंधी भंग केल्याचा कांगावा त्या देशाने केला आहे.
भारतीय जवानांनी 13 ऑगस्टला पुन्हा शस्त्रसंधी भंग करत चिथावणीखोर मारा केला. त्यामध्ये आमचा एक नागरिक मृत्युमुखी पडला, असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला. एवढेच नव्हे तर, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी बुधवारी भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना पाचारण केले. भारतीय सुरक्षा दलांकडून सीमेलगत आणि नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत वारंवार मारा केला जातो. त्यावेळी आमच्या नागरी भागांना लक्ष्य केले जाते. भारताची कृती विभागीय शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोका ठरत आहे.
भारताने शस्त्रसंधी कराराचा आदर राखावा, असा थयथयाट फैसल यांनी केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेलगत आणि एलओसीलगत शांतता कायम राहावी यासाठी 2003 मध्ये शस्त्रसंधी करार झाला. मात्र, त्या कराराचे उल्लंघन करण्याची आगळीक प्रथम पाकिस्तानकडूनच वारंवार केली जाते. पाकिस्तानी सैनिक भारतीय सीमा ठाण्यांबरोबरच नागरी भागांवरही मारा करतात. पाकिस्तानच्या त्या आगळिकींना केवळ जबर प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांकडून अवलंबले जाते. त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची मोठी हानी होते. मात्र, त्यातून पाकिस्तान कुठला धडा घेत असल्याचे दिसत नाही. उलट तो देश भारतविरोधी कांगावा करतो.