– अमित डोंगरे
भारत व न्यूझीलंड यांच्यातील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतील फलंदाजी पाहिली की असे वाटते इंग्लंड व ऑस्ट्रेलिया वगळता जागतिक क्रिकेटमध्ये अन्य कोणत्याही देशाला कसोटी क्रिकेटचे गांभीर्य राहिलेले नाही. या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयी झाला असला तरीही त्यात भारतीय संघाच्या अपयशी फलंदाजीचाही वाटा होता. अर्थात हे वर्चस्व म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी इतकेच आहे.
आयसीसीने कसोटी क्रिकेटची लोकप्रियता टिकून राहावी यासाठी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली. त्यात कसोटी खेळत असलेल्या सगळ्या देशांमधून भारत व न्यूझीलंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. खरेतर दोन दशकांपूर्वी ही स्पर्धा खेळवली गेली असती तर त्यात आतापेक्षा प्रचंड चुरस दिसली असती. त्यावेळी टी-20 क्रिकेटचा उदय झालेला नव्हता. या प्रकारचे क्रिकेट सुरू झाले आणि कसोटीच्या मुशीतील खेळाडू तयार होणेच बंद झाले. चेतेश्वर पुजारासारख्या काही थोड्या खेळाडूंवर कसोटी फलंदाज असा शिक्का बसला असला तरीही त्यांनाही सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे.
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, पुजारा यांच्या बॅटमधून धावाच निघत नाहीत हे या सामन्यातही दिसले. जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जात असलेला कोहलीदेखील सध्या सुमार खेळ करत आहे. त्याचे वर्तन मैदानापेक्षा बाहेरच जास्त गाजत आहे. यातूनच कसोटी क्रिकेटबाबत आता खेळाडूंना कितपत गांभीर्य उरले आहे तेच लक्षात येते. येत्या काळात कसोटी क्रिकेट काळाच्या पडद्याआड तर जाणार नाही ना अशी भीती वाटू लागली आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतापेक्षा थोडी सरस कामगिरी केली. मात्र, त्यांचा कर्णधार केन विल्यमसन व नवोदित डेव्हन कॉनवे वगळता अन्य फलंदाजही मर्यादित षटकांचेच क्रिकेट खेळत असल्यासारखे बाद झाले. पूर्वी आपला ऑफ स्टंप कुठे आहे ते लक्षात घेत विक्रमादित्य सुनील गावसकरांसारखे फलंदाज संपूर्ण दिवस खेळून काढायचे. त्यांचा वारसा राहुल द्रविडने जपला मात्र, आता हा वारसा पुढे घेऊन जाणारे फलंदाजच दिसत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
कसोटी क्रिकेट खेळून जगावर राज्य करणारे सर डॉन ब्रॅडमन यांचा एक किस्सा सांगितला जातो. एकदा ते इंग्लंडमध्ये कसोटी खेळताना त्रिशतक फटकावून संपूर्ण दिवस नाबाद होते. त्यावेळी लंडन टाईम्स या वृत्तपत्रात, ही बॅट्स ऍण्ड बॅट्स ऍण्ड बॅट्स असे शीर्षक प्रसिद्ध झाले होते. संपूर्ण इंग्लंडला ही म्हणजे कोण ते सांगावे लागले नाही. आज ते असते तर त्यांना भारत व न्यूझीलंडची फलंदाजी पाहून नैराश्य आले असते.
अशी दहशत असलेला एकही फलंदाज सध्या अस्तित्वात नाही. सचिनने ही मक्तेदारी कधी दाखवली नव्हती आणि सध्याच्या विराट कोहलीबाबत बोलायचे तर त्याच्यातील जागतिक दर्जाच्या फलंदाजाचे रूपांतर ओव्हररेटेड क्रिकेटर असे झाले आहे हे दुर्दैवाने सांगावेसे वाटते. एकीकडे आयसीसी कसोटी जिवंत राहावी तसेच त्याचा लोकप्रियता व प्रतिष्ठा टिकून राहावी यासाठी प्रयत्न करत असताना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील खेळाने साफ हिरमोड झाला आहे. एक उपाय सुचवावासा वाटतो.
आयसीसीचे प्रमुख देश जेव्हा संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक तयार करतात तेव्हा त्यांना एका वर्षात किमान पाच कसोटी सामने खेळणे बंधनकारक केले पाहिजे तरच त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल. अर्थात, लेबल आयसीसीचे असले तरी खरे जागतिक क्रिकेट बीसीसीआयच चालवत आहे. त्यामुळे हा उपाय किती यशस्वी होईल हे सांगता येत नाही; पण हा सामना पाहून तरी असेच विचारावेसे वाचते की, आता कोणाला कसोटी क्रिकेटचे गांभीर्य तरी राहिले
आहे का?