समरकंद – उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत “मॅन्युफॅक्चरिंग हब’च्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, जग कोविड-19चा सामना करत आहे. कोविड आणि युक्रेनच्या संकटामुळे जागतिक पातळीवर आयात-निर्यातीत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आम्हाला भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज भारतात 70 हजारांहून अधिक स्टार्ट-अप सुरू झाले आहेत. त्यापैकी 100 हून अधिक युनिकॉर्न आहेत.
एससीओ सदस्य देश जागतिक जीडीपीमध्ये सुमारे 30 टक्के योगदान देतात आणि जगातील 40 टक्के लोकसंख्या या गटातील सदस्य देशांमध्ये राहते. भारताची अर्थव्यवस्था यावर्षी 7.5 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, जी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असेल. आम्ही प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मितीला पाठिंबा देत आहोत.
दुसरीकडे महामारी आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय निर्माण झाला आहे. ज्यामुळे जगाला अभूतपूर्व ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इतर नेत्यांमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि व्यापारवाढीवर चर्चा झाली. तत्पूर्वी उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला आरिफॉव्ह आणि समरकंदचे राज्यपाल यांनी पंतप्रधान मोदींचे समरकंदमध्ये स्वागत केले. समरकंदमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचे दोन सत्र होणार आहेत. पहिल्या सत्रात केवळ शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य सहभागी होणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये इतर देशांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.