नवी दिल्ली : संपूर्ण जगाला करोनाच्या नव्या व्हेरियंटने धडकी भरली आहे. त्यातच भारतात ओमायक्रॉनने एंट्री केली आहे. बंगळुरूमध्ये दोन जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातील महत्वाचे म्हणजे करोना लसीचा बुस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसची गरज आहे का? लहान मुलांचे लसीकरण सुरु झालेले नाही, त्यामुळे या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी त्यांचे लसीकरण तात्काळ सुरु करण्याची गरज आहे का? असे प्रश्न निर्माण झाले असून याविषयी सरकारकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, करोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत अद्याप फारशी माहिती कळालेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरससंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच लसीकरणाबाबतचे निर्णय विज्ञान आणि वैज्ञानिक निकशांच्या आधारावर घेतले जातात.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत या व्हायरसबाबत मिळालेली माहिती पुरेशी नाही. याबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच लसीचा आणखी एक डोस किंवा बुस्टर डोस डोस द्यावा की, नाही? याबाबतही ठामपणे काहीच सांगणे अशक्य आहे. लस किंवा उपचाराबाबत असे निर्णय सर्व पैलू, वैज्ञानिक पुरावे, संशोधन लक्षात घेऊन घेतले जातात.
नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी या व्हेरियंट विषयी माहिती दिली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ओमायक्रॉनची वैशिष्ट्ये, त्याचा प्रभाव, त्याचे परिणाम हे सर्व सध्या पाहिले जात असून समजून घेतलं जात आहे. आज देशातच नाहीतर संपूर्ण जगात यामुळे लसीकरण किंवा उपचारांवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही तुम्हाला जे सांगितलं ती सध्याची परिस्थिती आहे. व्हेरियंटबद्दल आणखी काही माहिती आल्यावर त्यावर निर्णय घेणे योग्य ठरेल, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
व्ही. के. पॉल म्हणाले की, “लहान मुलांच्या लसीकरणावर सरकारचं म्हणणं आहे की, याबाबतचा कोणताही निर्णय वैज्ञानिक निकशांच्या आधारावर घेण्यात यावा, तेव्हाच जेव्हा संपूर्ण माहिती आपल्या हाती असेल. केवळ चिंतेचे स्वरूप घोषित करून असे निर्णय घाईघाईने घेतले जाऊ शकत नाहीत.
हा एवढा मोठा निर्णय आहे की, यामुळे रणनीती कोणत्या दिशेने जाते, बूस्टर डोससाठी त्याचा परिणाम काय आहे, हे सर्व अभ्यास, त्याच्या वैज्ञानिक पैलूंचा बारकाईने अभ्यास करून, त्यावर बारीक लक्ष ठेवून काम सुरु आहे. याची तांत्रिक आणि वैज्ञानिक वर्तुळात चर्चा आहे. या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे समोर येणार्या वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.