नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा एक भाग म्हणजेच हवाई संरक्षण यंत्रणा आहे. याच भारताच्या हवाई सुरक्षेत आज आणखी वाढ झाली आहे. भारताने आज ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावर मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. डीआरडीओच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “ही हवाई संरक्षण यंत्रणा भारतीय लष्कराचा महत्त्वाचा भाग आहे. हे क्षेपणास्त्राने लांब अंतरावरून लक्ष्यावर थेट हल्ला करु शकते”.
भारताने याआधी 23 मार्च ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करण्याची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी अंदमान आणि निकोबार बेटांवर करण्यात आली. संरक्षण अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली होती. या क्षेपणास्त्राने थेट लक्ष्य गाठल्याचे त्यांनी सांगितले होते.
एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनीही जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.
भारत आपले संरक्षण बजेट सातत्याने वाढवत आहे. देशाचे लक्ष संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्यावर आहे. त्यामुळे भारताची संरक्षण आयात कमी करून निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे. गेल्या आठ वर्षांत भारताच्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत सहा पटीने वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताने आतापर्यंत 11,607 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात केली आल्याचे सांगण्यात येत आहे.