गुवाहाटी – भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना येत्या रविवारी येथे होत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात येथे आंदोलन सुरु असून त्याचेच सावट या सामन्यावर देखील आहे.
श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून, दोन्ही संघांदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेला येत्या रविवारी पहिल्या सामन्याने सुरुवात होत आहे. येथील बारसापारा स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
देशभर सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात विविध ठिकाणी जोरदार आंदोलने होत आहेत, तशीच परिस्थिती येथे देखील असल्याने पहिल्याच सामन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप काहीही जाहीर केले नसले तरी ही मालिका पुर्वनियोजीत वेळापत्रकानुसारच होईल, असे आसाम राज्य संघटनेने स्पष्ट केले आहे. अर्थात या सामन्याच्या सुरक्षेबाबत शहरातील पोलीस आयुक्तालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
नव्या वर्षातील पहिली मालिका सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी ही मालिका खूप महत्वाची असल्याने खेळाडू देखील सामना व्हावा अशी अपेक्षा ठेवत आहेत.