राहुल, कार्तिक, केदार आणि शंकरला संधी
मुंबई – इग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दुसरा यष्टीरक्षक आणि चौथ्या क्रमांकासाठी कोणाला संधी मिळणार? याकडे संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष होते. चुरशीच्या स्पर्धेमध्ये अनुभवी दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली असून ऋषभ पंतची निवड केली गेली नाही. कार्तिक सोबतच विजय शंकर, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजालाही संघात संधी मिळाली.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडीबाबत सोमवारी मुंबईत बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यासह सदस्य आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी विराट कोहलीकडे विश्वचषकासाठी देखील भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.
संघाकडून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची उत्सुकता संपली आहे. या क्रमांकासाठी विजय शंकरला पसंती दिली आहे. अंबाती रायडूला संधी मिळू शकली नाही. संघात लोकेश राहुलचा पर्यायी सलामीवीर म्हणुन समावेश करण्यात आला आहे. तर, दिनेश कार्तिककडे पर्यायी य ष्टीरक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यातच ऋषभ पंतला यष्टीरक्षणातील उणीवांमुळे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही एमएसके प्रसाद यांनी या वेळी सांगितले.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, विजय शंकर, एम. एस. धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी.