काबुल: अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा मिळवल्यानंतर अखेर तिथे तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर त्यांच्या भूमिकांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. त्यातच आता तालिबानी नेत्याने भारताला कडक शब्दात इशारा दिला आहे.
“तालिबान विरोधकांना भारताने आश्रय देऊ नये. यापासून त्यांनी लांब राहिले पाहिजे. तालिबान विरोधात आश्रय देऊन सरकारविरोधात व्यासपीठ देण्यासारखं आहे. त्यामुळे तालिबानला कृती करणं भाग पडेल”, असे गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
“अफगाणिस्तान आणि त्यांच्या नविन राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्नामध्ये रस नाही. अफगाणिस्तान भूमीचा वापर इतर देशांना करू देणार नाही. भारताने याबाबत भीती बाळगू नये.”, असेही त्यांनी पुढे सांगितले. “अफगाणिस्तानवर दोन देश सत्ता मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. या अपयशाचा भारताने पुनर्विचार करावा आणि ऐतिहासिक चुका भरून काढाव्या”, असे देखील त्यांनी पुढे सांगितले.
“भारताने आता अफगाणिस्तानबद्दल सकारात्मक भूमिका घ्यावी. यापूर्वी त्यांनी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. गेल्या चार दशकातील चुका भारताने दुरुस्त केल्या पाहिजेत. विदेशी राजवटींचे समर्थन करू नये”, असे देखील सांगितले.
७२ वर्षीय हेकमत्यार यांना २०१७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती अशरफ घनी यांनी माफी दिली होती. हेकमत्यार यांच्यावर १९९२ ते १९९६ दरम्यान काबुलमधृ्ये हजारो नागरिकांना ठार मारल्याचा आरोप आहे. ते दोन वेळा अफगाणिस्तानचे पंतप्रधान देखील होते. त्यानी जून १९९३ आणि जून १९९६ मध्ये या वर्षात पंतप्रधानपदावर होते.
दुसरीकडे, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबान प्रवक्ता सुहैल शाहिन याने काश्मीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे तालिबानचं वक्तव्य भारतासाठी चिंता वाढवणारं आहे. “आमच्याकडे काश्मीरमधील मुस्लिमांचा आवाज उचलण्याचा अधिकार आहे.”, असं वक्तव्य प्रवक्ता सुहैल शाहिन याने मुलाखती दरम्यान केले होते.