काश्मीर मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाला स्थान नसल्याचे केले स्पष्ट
नवी दिल्ली : काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याची ऑफर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच महिन्यांच्या कालावधीत चौथ्यांदा दिली. मात्र, भूमिकेवर ठाम राहत भारताने काश्मीर मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाला कुठले स्थान नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये भारताने धडक पाऊल उचलत जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे काश्मीरवर वाकडी नजर ठेवणाऱ्या पाकिस्तानचा पोटशूळ उठला. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणी प्रतिसाद देत नसल्याने पाकिस्तानकडून वारंवार अमेरिकेसमोर रडगाणे गायले जात आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी याआधी तीनवेळा मध्यस्थीची तयारी दर्शवली.
मात्र, काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय विषय आहे. त्यावरील तोडग्यासाठी इतर कुणी मध्यस्थी किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी परखड भूमिका भारताने प्रत्येकवेळी मांडली.
त्यानंतर ट्रम्प यांनी भारताची भूमिका मान्य करत मध्यस्थीच्या ऑफरवरून घूमजाव केले. मात्र, मंगळवारी दावोसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट झाल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे भारताला पुन्हा आपल्या ठाम आणि रास्त भूमिकेचा पुनरूच्चार करावा लागला.