नवी दिल्ली – बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यावर पाकिस्तानने या निकालावर जोरदार टीका केली होती.
मात्र भारताने पाकिस्तानची ही टीका स्पष्ट शब्दात फेटाळून लावली आहे.
‘जबरदस्तीचे तंत्र’ अवलंबणाऱ्या पाकिस्तानला लोकशही मूल्य आणि कायद्याचे राज्य या बाबी समजणे अवघड आहे, अशा शब्दात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ऑनलाईन वार्तालापामध्ये सांगितले आणि पाकिस्तानच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
बाबरी प्रकरणावरील न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना भारताने अल्पसंख्याकांचे विशेषतः मुस्लिमांचे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांचे रक्षण करावे, अशी मागणी पाकिस्तानने केली होती.