नवी दिल्ली – संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेर्रेस यांनी आपल्या पाकिस्ताना दौऱ्यात काश्मीरातील स्थितीवर चिंता व्यक्त करतानाच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती, पण भारताने त्यांची ही ऑफर धुडकाऊन लावली आहे. आज पाकिस्तान व्याप्त प्रदेश दहशतवाद्यांपासून मुक्त करणे या प्रश्नाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे भारताने म्हटले आहे.
संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांच्या कालच्या इस्लामाबाद येथील वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्याने काल वरील प्रतिक्रीया नोंदवली. भारताचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितले की जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो अविभाज्यच राहील. संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनी पाकिस्तानला सीमा पार दहशतवाद थांबवण्याची सुचना करावी आणि त्यांच्यावर त्या अनुषंगाने कारवाई करावी अशी सुचनाही त्यांनी केली. काश्मीर विषयी जर काही प्रश्न असेल तर तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य केली जाणार नाही असेही रविशकुमार यांनी स्पष्ट केले.
संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांनी पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांच्या समवेत इस्लामाबादेत नुकतीच एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी जम्मू काश्मीरातील स्थिती आणि दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष ताबारेषेवर असलेल्या तणावाबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी कमालीचा संयम पाळून तणाव वाढणार नाही याची काळजी घेण्याचीही सूचना त्यांनी केली आहे.