संयुक्त राष्ट्र – आंतरराष्ट्रीय वांशिक हिंसाचार पीडीत स्मरण दिनाच्या निमित्ताने भारताच्यावतीने आज पाकिस्तानातील हत्या झालेले लाखो नागरिक आणि अत्याचारग्रस्त महिलांच्याप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली.
बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामाच्या वेळी 1971 मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून आणि धार्मिक कट्टरवाद्यांकडून तब्बल 30 लाख जणांची हत्या करण्यात आली, तर 2 लाख महिलांवर बलात्कार करण्यात आला होता, याचे स्मरण भारताच्यावतीने करण्यात आले.
1971 साली 25 मार्चच्या मध्यरात्री तत्कालिन पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश)मध्ये पाकिस्तान सैन्याने थैमान घालायला सुरुवात केल्यावर युद्धाला प्रारंभ झाला होता तर 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य आणि बंगाली मुक्तीसेनेसमोर शरणागती स्वीकारल्यावर हे युद्ध समाप्त झाले होते.
9 महिने चाललेल्या या संघर्षात 30 लाख नागरीक ठार झाले होते. मानवतेच्या इतिहासात झालेला हा अतिशय भीषण नरसंहार पुन्हा घडू नये. आंतरराष्ट्रीय वांशिक हिंसाचार पीडीत दिनानिमित्ताने या हिंसाचारातील पीडीतांबद्दल आदरांजली वाहूया, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी आणि भारताचे राजदूत टी एस तिरुमूर्ती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
द्वेष आणि विद्ध्वंसाच्या त्सुनामीतून हा हिंसाचार घडत असल्याने वंशिक हिंसाचार हा अतिशय घृणास्पद गुन्हा आहे, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ ग्युटरेज यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय वांशिक हिंसाचार पीडीतांच्या स्मरणार्थ दरवर्षी 9 डिसेंबर या दिवशी त्या पीडीतांचे स्मरण केले जाते.