नवी दिल्ली – कोविड 19 विरुद्धच्या लढ्यात देश विजयपथावर वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केंद्रात भाजपा सरकार दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या लढ्यात भारताच्या कामगिरीनं सारे जग चकित झाले आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी आणण्याच्या प्रयत्नांचा वस्तुपाठही भारत जगासमोर ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या या पत्राचे ऑडिओ आवृत्तीही पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केले आहे.
या लढाईत अनेक मजूर, छोटे व्यावसायिक, फेरीवाले इत्यादींना त्रास भोगावा लागला तरी आपण सर्व एकजुटीने तो दूर करू असे मोदी यांनी म्हटले आहे. या कसोटीच्या काळात सर्वांनी नियम आणि सूचनांचे पालन करावे आणि संयम राखावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोविड-19 नंतरच्या जगात आत्मनिर्भरता ही गरज आणि प्रगतीची संधी असल्याचे सांगून त्यादृष्टीने सरकारने दिलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा त्यांनी उल्लेख केला आहे. गेल्या वर्षभरात संसदेतली कार्यक्षमता वाढली आहे. आता ग्रामीण- शहरी क्षेत्रातला फरक पुसट होत चालला आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.