नवी दिल्ली – भारताचा आर्थिक विकास दर उणे आठ टक्के इतक्या पातळीवर गेला असल्याने तेथून बाहेर येण्यासाठी भारताला अधिक वेगाने आपला आर्थिक विकास गाठावा लागेल अशी सुचना आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या आर्थिक सल्लागार पी. के. ब्रुक्स यांनी पीटीआयशी बोलताना केली.
ते म्हणाले की, करोनाच्या आपत्तीचा भारताच्या अर्थकारणावर मोठाच परिणाम झाला असल्याने त्यांना देशातील जनतेसाठी आणखी आर्थिक मदतीचा हात देण्याशिवाय गत्यंतर नाही. गेल्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था साफ कोलमडली होती. उणे आठ टक्के इतका भीषण विकास दर त्यावेळी नोंदवला गेला होता. हा झटका मोठा होता. त्यातून भारतीय अर्थव्यवस्था आपोआप सुधारणार नाही असेही त्यांनी नमूद केले. यंदाच्या आर्थिक वर्षात साडे बारा टक्के इतका विकास दर राहील असे भाकित करण्यात आले आहे, ही चांगली बातमी आहे. पण आता तेवढ्याने भागेल असे नाही अशी टिपण्णीही त्यांनी केली.