औरंगाबाद : भारताने अहिंसा हे मुल्य अगदी प्राचीन काळापासून जपले आहे. या मुल्याची साऱ्या जगाला गरज आहे असे प्रतिपादन तिबेटचे धार्मिक गुरू दलाईलामा यांनी केले आहे. औरंगाबाद येथे जागतिक बुद्धिस्ट परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या परिषदेसाठी ते येथे आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की अहिंसा आणि करूणा या मुल्यामुळे जगातल्या अनेक धर्मातील लोकही शांतता अनुभवत आहेत.
आज जगात अनेक ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे. ज्या ज्या वेळी मला संघर्षाची माहिती मिळते त्या प्रत्येक वेळी मला दु:ख होते. या पार्श्वभूमीवर जग केवळ अहिंसा आणि करूणा या तत्वानेच शांत राहु शकते असे ते म्हणाले. जगात तत्व किंवा तत्वज्ञानातील मतभेद असू शकतात पण त्यातून संघर्ष उद्भवणार नाही यासाठी सहिष्णुतेचे तत्वही महत्वाचे आहे. जर समाज आनंदी असेल तर व्यक्तीही आनंदी राहु शकते.
पाश्चात्य शिक्षण पद्धतीत भौतिक शिक्षणावर खूप भर दिला गेला असला तरी भारताच्या मुल्या शिक्षणाचीही आता कास धरावी लागणार आहे असे ते म्हणाले. भारतात जात आधारीत समाज रचना ही एक मोठी अडचण आहे. पण त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरूवात केली. मी स्वताला नेहमी भारताचाच पुत्र म्हणवून घेत आलो आहोत. मी जन्माने तिबेटी असलो तरी भारतात मी 60 वर्ष राहिलो आहे. नालंदांच्या विचाराचा माझ्यावर प्रभाव आहे असेही त्यांनी नमूद केले.