वॉशिंग्टन: भारताला शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधायचा असेल तर भारताने अधिक आर्थिक सुधारणा केल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य प्रवक्ते गेरी राईन यांनी भारतातील विदेशी गुंतवणुकीच्या संबंधात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना वरील प्रतिक्रिया दिली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी अलीकडेच भारतात 20 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव ठेवले आहेत आणि या वर्षात आतापर्यंत भारतात 40 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे.
भारताने विदेशी गुंतवणुकीसाठी सातत्याने प्रयत्न चालवले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत आहे. भारताने अलीकडेच काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा केल्या आहेत त्यामुळे “ईज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये भारताचा क्रमांक सुधारला आहे असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. पण भारताला यापेक्षाही चांगली कामगिरी करून विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवायचे असेल तर आणखी आर्थिक सुधारणांशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.
भारताला पायाभूत सुविधांसाठीही आणखी गुंतवणूक करावी लागेल, असे त्यांनी नमूद केले. राईन म्हणाले की, भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही जो अंदाज वर्तवला होता त्यापेक्षाही भारताची जीडीपी कमी होण्याची शक्यता आहे. पण करोनामुळे जगातील अन्यही देशांत अशीच स्थिती आहे.