बर्मिंगहॅम – आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारतीय संघाला येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत विजयाचीच गरज आहे. ही कसोटी हरल्यास भारतासमोर अजिंक्यपदाच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्याचे आव्हान निर्माण होणार असून, त्यानंतर यंदाच्या मोसमात होत असलेल्या सर्व कसोटी सामन्यांत त्यांना विजय प्राप्त करावा लागणार आहे.
गेल्या वर्षीच्या या मालिकेतील ही अखेरची कसोटी करोनाच्या धोक्यामुळे स्थगित करण्यात आली होती. हीच कसोटी आता खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर असून, ही कसोटी गमावली तर ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल. त्याचा लाभ इंग्लंडला या अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमावारीत होणार असून भारताचे मात्र नुकसान होणार आहे.
भारतीय संघाने ही कसोटी जिंकली तर ही मालिकाही 3-1 अशी खिशात टाकता येणार आहे. तब्बल 15 वर्षांनंतर भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकेल. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. यानंतर 2011, 2014 व 2018 साली झालेल्या मालिका भारताला गमवाव्या लागल्या होत्या.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गेल्या वर्षीच्या पहिल्याच मोसमात भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र, त्यावेळी न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यावर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी सुमार कामगिरीमुळे न्यूझीलंड या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडलाही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.
भारतीय संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरीसाठी भारताला पहिल्या दोन क्रमांकात प्रवेश करावा लागणार असून, त्यासाठी ही कसोटी जिंकणे अनिवार्य बनले आहे. जर भारतीय संघ या कसोटीत पराभूत झाला तर यंदाच्या मोसमात यानंतर होत असलेल्या कसोटींपैकी भारतीय संघाला किमान सहा कसोटी जिंकाव्याच लागणार आहेत. यंदाच्या मोसमात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4, तर बांगलादेशाशी 2 कसोटी खेळणार आहे.