रायपूर – रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी रायपूर येथे पार पडला. हा सामना इंडिया लीजेंड्स (India Legends) आणि श्रीलंका लीजेंड्स (Sri Lanka Legends) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंडिया लीजेंड्सने 14 धावांनी श्रीलंका लीजेंड्सला पराभूत केले. इंडिया लीजेंड्सने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 181 धावांचा डोंगर उभारला होता.
या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका लीजेंड्सला 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावाच करता आल्या. त्यामुळे इंडिया लीजेंड्सने पहिल्यावहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
श्रीलंका लीजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंडिया लीजेंड्सने प्रथम फलंदाजी करताना सेहवागच्या 10(12) रुपाने पहिली विकेट गमावली. त्याचबरोबर सचिन तेंडूलकर 30(23) आणि एस बद्रिनाथ 7(5) धावा काढून बाद झाले.
युवराज आणि युसुफची शानदार अर्धशतके
इंडिया लीजेंड्सने पहिल्या 10 षटकांत 3 विकेट्स गमावून 78 धावा केल्या होत्या. त्यानंतर युवराज आणि युसुफने चौथ्या विकेट्साठी 85 धावांची भागीदारी केली. युवराज चौथ्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4चौकार आणि 4षटकार लगावत 60 धावा केल्या.
त्याचबरोबर युसुफने 36 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार खेचत नाबाद 62 धावांची खेळी केली.तसेच इरफान पठाने नाबाद 8(3) धावा केल्या. त्यामुळे इंडिया लेजेंड्सला 181 धावा करता आल्या. श्रीलंकेकडून हेराथ, जयसुर्या, महरुफ आणि वीरारत्ने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
श्रीलंका लीजेंड्सने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग तिलकरत्ने दिलशान आणि सनत जयसुर्या यांनी पहिल्या विकेट्साठी शानदार 62 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दिलशान 21 धावांवर बाद झाला. चमारा सिल्वा हा देखील 8 धावा काढून लगेच बाद झाला. जयसुर्याने संघाचा डाव सावरताना 43(35) धावा केल्या.
त्याचबरोबर चिंथाका जयसिंगे 40(30) आणि कौशल्य वीरारत्ने 38(15) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर श्रीलंका लीजेंड्स हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र इतर खेळाडूंनी केलेल्या गचाळ कामगिरीमुळे श्रीलंका लीजेंड्सला 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावाच करता आल्या. त्यामुळे श्रीलंका लीजेंड्स संघाचा पराभव झाला.
पठान बंधूची दमदार गोलंदाजी
आपल्या 181 धावांचा बचाव करताना इरफान आणि युसुफने शानदार गोलंदाजी केली. इरफानने 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर युसुफने 4 षटकांत 26 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. तसेच मनप्रीत गोणी आणि मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.