पुणे: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्टला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होणार आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा चौथा तर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा सामना आहे. 9 टीमच्या या स्पर्धेत भारताने आपले तिनही सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला खातंही उघडता आलेलं नाही.
या स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज यांच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशने अजून एकही सामना खेळलेला नाही.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने सर्वाधिक सामने खेळले आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 तर भारताने 3 सामने खेळले आहेत. न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी 2-2 सामने झाले आहेत तर दक्षिण आफ्रिकेचा एकच सामना झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने सर्वाधिक सामने खेळले असले तरी गुणतालिकेत भारतीय संघच पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे 160 गुण आहेत. तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 60 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने प्रत्येकी 56 गुण कमावले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील प्रत्येक विजयासाठी 40 गुण मिळणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय झाला तर 200 गुण कमावणारा पहिलाच संघ ठरेल. भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेते 120 गुण मिळाले होते. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला 40 गुण मिळाले.
भारताचा जर दुसऱ्या कसोटीत पराभव झाला किंवा सामना अनिर्णित राहिला तरी भारतच मालिकेत 200 गुण मिळतील मात्र त्यासाठी त्यांना तिसरी कसोटी जिंकावीच लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटीत भारताचा पराभव झाला तरी 200 गुण मिळवणारा पहिला संघ ठरण्याचा मान भारती. संघालाच मिळेल. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यात भारती. संघाला बांगलादेशला हरवावे लागेल.