पुणे – “हिंद महासागर क्षेत्राची (इंडियन ओशन रिजन) सुरक्षितता आणि विकास हाच भारताचा दृष्टिकोन आहे. या क्षेत्रात उद्भवलेल्या नैसर्गिक अथवा मानवी आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रतिसाद देणारा भारत नेहमीच पहिला देश असतो. यापुढील काळातही अशा प्रकारचा प्रतिसाद भारताकडून कायम मिळत राहील,’ असे आश्वासन संरक्षणमंत्री राज्यनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
भारतीय लष्करातर्फे पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी आयोजित “पॅनेक्स 21′ या संयुक्त सरावाचा आढावा घेताना ते बोलले. याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, बिमस्टेक (बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) राष्ट्रांचे सदस्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते. पुण्यात 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत झालेल्या संयुक्त सरावात भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या राष्ट्रांनी सहभाग नोंदविला. सदस्य राष्ट्रांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत परस्पर सहकार्य आणि सामंजस्य वाढविणे आणि मदतकार्यासाठी आवश्यक संसाधन सज्जता वाढविणे हे या संयुक्त सरावाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.