लंडन – विश्वचषक राखण्याच्या आमच्या मार्गात भारत हाच मुख्य अडथळा आहे. या संघातील काही खेळाडू बेभरवशी असले तरीही आम्हाला त्यांच्याबाबत धास्ती वाटत असते असे मत कोणत्याही सामान्य खेळाडूने व्यक्त केलेले नसून ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ खेळाडू ऍलन बॉर्डर यांनी व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुध्दच्या तीन सामन्यांसह सलग दहा एक दिवसीय सामने जिंकले आहे. बॉर्डर यांनी सांगितले, आमच्यासाठी ही समाधानकारक गोष्ट असली तरीही सामन्यास कलाट्णी देण्याबाबत भारतीय तरबेज आहेत. भारतीय संघात कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासारखे अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. आम्ही अन्य संघांविरुध्द अनेक सामने खेळले आहेत. या संघांविरुध्दच्या सामन्यांबाबत नियोजन करताना आम्हाला फारशी अडचण येत नाही. मात्र भारताविरुध्दच्या सामन्याबाबत नियोजन करणे कठीण असते.
अफगाणिस्तान व वेस्ट् इंडीज यांच्याविरुध्द आम्ही सामने जिंकले असले तरीही या दोन्ही लढतींमध्ये आमच्या नावलौकिकास साजेसा खेळ झालेला नाही. त्यामुळेच भारताबरोबरच्या लढतीत आमच्या खेळाडूंना क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करावी लागणार आहे. अर्थात आमच्या संघाच्या प्रगतीबाबत मी समाधानी आहे.