लॉस एंजेलीस – भारत सरकारने या अगोदरच संयुक्त अरब अमीरात व ऑस्ट्रेलिया बरोबर मुक्त व्यापार करार केला. वर्षाच्या अखेरीस आणखी दोन देशाबरोबर मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता आहे. ही माहिती वाणिज्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वाणिज्य मंत्री पियुष गोयल सध्या अमेरिका भेटीवर आहेत. यावेळी गोयल सोबत उपस्थितीत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संयुक्त अरम अमीरात आणि ऑस्ट्रेलिया बरोबर झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे या देशाबरोबरचा भारताचा व्यापार वाढण्याची शक्यता आहे.
अशाच प्रकारची बोलणी सध्या ब्रिटनबरोबर चालली आहे आणि दिवाळी अगोदर ब्रिटन बरोबरचा मुक्त व्यापार करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. कॅनडाबरोबरही अशा प्रकारची चर्चा चालू आहे. एकूण परिस्थिती पाहता कॅनडा भारताबरोबर मुक्त व्यापार करार करण्यास उत्सुक आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देश परस्परांच्या वस्तूवरील लायात शुल्क कमी करत आहेत.
त्यामुळे दोन्ही देशांना व्यापार वाढविण्यासाठी मदत होत आहे. भारत आणि अमेरिकेचा व्यापार वाढत असून आगामी काळामध्ये हा व्यापार वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताने यावर्षी 450 अब्ज डॉलरचे निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. आतापर्यंत जी निर्यात झाली आहे, यावरून आगामी काळामध्ये हे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल असे दिसून येते.
भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. आणखी काही वर्षातच भारताची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरची होणार आहे. त्यामुळे देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी भारतामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले.