नवी दिल्ली – करोना फैलावाचे शिखर गाठण्यापासून भारत खूप दूर आहे. फैलाव रोखण्यासाठी देशात उचलण्यात आलेली प्रतिबंधात्मक पाऊले अत्यंत प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती अतिशय चांगली आहे, असा दिलासा मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला.
भारतातील करोनाबाधित आणि बळींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत भारत आता सातव्या स्थानी पोहचला आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सकारात्मक बाजू मांडली. केवळ आकडेवारी पाहणे चुकीचे ठरेल. लोकसंख्याही विचारात घ्यायला हवी. जगातील 14 देशांत करोनाने भारताच्या 55 पट बळी घेतले आहेत. त्या देशांची मिळून लोकसंख्या जवळपास भारताइतकी आहे.
जागतिक करोना मृत्यूदर 6.13 टक्के आहे. तर भारतातील मृत्यूदर जगात जवळपास सर्वांत कमी म्हणजे 2.82 टक्के इतका आहे. भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात मृत्यूदर अवघा 0.41 टक्का आहे. तो जागतिक दर 4.90 टक्के आहे, असे आगरवाल यांनी नमूद केले.
करोना संसर्गामुळे भारतात झालेल्या प्रत्येक दोन मृत्यूमागे एक मृत्यू ज्येष्ठ नागरिकाचा आहे. देशात करोनाचे बळी ठरलेल्यांपैकी 73 टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय रोग आणि श्वसनाचे आजार होते. देशातील बाधित करोनामुक्त होण्याचे प्रमाण 48 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.