नवी दिल्ली – सर्वाधिक गरिबी आणि असमानता असलेल्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे. गेल्या काही वर्षात भारतातील गरिबी आणि असमानता कमालीची वाढली आहे. त्यामुळे भारतातील खालच्या वर्गातील नागरिकांची स्थिती दयनीय झाली आहे. भारतात श्रीमंत लोक अधिक श्रीमंत बनत असून गरीब अधिक गरीब होत चालला आहे असा निष्कर्ष यात काढण्यात आला आहे.
जागतिक असमानता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, भारतातील दहा टक्के लोकांकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 57 टक्के वाटा आहे. तर खालच्या स्तरातील 50 टक्के लोकसंख्येकडे केवळ राष्ट्रीय उत्पन्नातील 13 टक्केच वाटा आहे.
भारतातील एक टक्का श्रीमंत लोकांकडे देशातील एकूण उत्पन्नाच्या 33 टक्के इतका वाटा आहे. भारतातील मध्यमवर्ग तुलनेने अधिक गरीब असून त्यांचे उत्पन्न अगदीच तोकडे आहे. खालच्या स्तरातील 50 टक्के लोकांचे सरासरी उत्पन्न केवळ 56 हजार 610 रुपये इतके आहे तर 10 टक्के श्रीमंत लोकसंख्येतील नागरिकांचे सरासरी उत्पन्न त्यांच्यापेक्षा किमान 20 पट अधिक म्हणजे 11 लाख 66 हजार 520 रुपये इतके आहे.