नवी दिल्ली – एऑन या व्यावसायिक सर्व्हे करणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार, जवळपास 88 टक्के भारतीय कंपन्या यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी अनुकुल आहेत. करोनामुळे दोन वर्षांपासून रखडेली पगारवाढ झाल्यास या महागाईच्या काळात खासगी नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या वर्षी करोनाचे संकट असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. परिणामी सर्वच उद्योगांना याचा मोठा फटका बसला. मंदी सदृष्य परिस्थिती तयार झाल्याने देशातील सर्वच खासगी उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 20,40,50 टक्यांनी कपात केली होती. अनेकांना आपला रोजगारही गमवावा लागला.
सध्या सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. करोनाच्या मंदीतून उद्योग क्षेत्र बाहेर येताना दिसत आहे. याचाच परिणाम यावर्षी देशातील 88 टक्के खासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी सकारात्मक आहेत. एऑन कंपनीच्या सर्व्हेच्या अहवालानुसार, यावर्षी खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारात 7.7 टक्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
हा अहवाल तयार करण्यासाठी जवळपास 20 उद्योगातील 1200 कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यानुसार ई-काॅमर्स आणि व्हेन्चर कॅपिटल कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे 10 टक्के पगारवाढ देण्याची शक्यता आहे.
करोना काळात अनेक कंपन्यांनी खुप कमी प्रमाणात पगारवाढ केलीय. मात्र, करोना काळात आर्थिक मंदी आली असली तरीही BRIC देशांमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यात भारताचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.